15 August–Independace Day

१५ ऑगस्ट म्हणजे काय?

आपल्या झोपडपट्टीच्या गल्लीसमोर भर रस्त्यात स्पीकरची बॅरिकेड उभी करून
त्यावर आज देशभक्तीची तर काही दिवसांनी गणपतीची तर कधी शिवाजी महाराजांची
गाणी मोठ्याने लावून आपण मित्रांबारोबर चकाट्या पीटण्याचे स्वातंत्र्य

मांडववाले, बॅनरवाले आणि ब्लडबँकवाले यांना गोळा करून दुसऱ्याच्या रक्तावर
पुण्य कमावण्याचे सामाजिक कार्यकर्त्याचे स्वातंत्र्य

चालत्या बस मधून थुंकण्याचे, रस्त्याच्या उजव्या बाजूने जाऊन रस्ता जाम करण्याचे
कितीही शिकलो तरी गाडी चालवताना मोबाईल वापरण्याचे स्वातंत्र्य

थोड्याश्या डीझेलच्या बचतीसाठी रस्त्याच्या उजव्या बाजूने जाऊन
निरपराध माणसांचे जीव घेण्याचे स्वातंत्र्य

पाट्या वाचून सुद्धा बसच्या लोकलच्या दारात उभे राहून अपघाती मरण्याचे स्वातंत्र्य

धोकादायक रसायन कंपनीचा परिसर, नदीच्या पुराची सीमा या सारख्या ठिकाणी
गरीबी आणि अंतर यांची सबब सांगून घर बांधण्याचे आणि
गॅसच्या धुरात किंवा  पुराच्या पाण्यात मरण्याचे स्वातंत्र्य

आपण कितीही फुटकळ नोकरी करत असलो तरी कर्ज काढून शहराच्या
मध्यवस्तीत काही हजार लोकांना बोलावून जेवू घालण्याचे स्वातंत्र्य

नवरदेवाला सजवून त्याच्या वरातीच्या निमित्ताने किंवा देवाला रस्त्यावर आणून
त्याच्या मिरवणूकीच्या, नवरात्रीच्या तोरण महोत्सवाच्या निमित्ताने
मागे शेकडो गाड्यांचे इंधन वेळ वाया घालवून
त्यांच्यापैकी कुणी थोडा जरी विरोध केला तर त्यांच्यावर
अर्वाच्य शिवीगाळ करण्याचे स्वातंत्र्य

शिवाजी महाराज, बाबासाहेब यांना एकाच रंगात रंगवण्याचे आणि त्यांचा आपल्या
वर्तनात थोडाही अंश न दाखवण्याचे, त्यांच्याशिवाय आपल्या समाजात दुसरा
एकही नेता झाला नाही तरी लाज न वाटण्याचे स्वातंत्र्य

आपली कोठेही शाखा नाही हे अभिमानाने सांगण्याचे,
दुपारी एक ते चार दुकान बंद ठेवणाऱ्या मराठी माणसाला हसण्याचे
आणि तसेच वागणाऱ्या युरोपिअन लोकांचे गोडवे गाण्याचे स्वातंत्र्य

अल्पसंख्यांकांची बाजू ऐकताना बहुसंख्यांची वाट लावण्याचे, माणुसकीच्या नावाखाली
बेकायदा मतदारांवर कायद्याने चालणाऱ्या लोकांचे पैसे उधळण्याचे स्वातंत्र्य

बऱ्याचश्या पैशांसाठी आपल्याच देशाच्या लोकांची मारण्याचे,
देशाच्या गौरवाकारिता भ्रष्टाचार करणारयाला अभय देण्याचे पण
त्याच देशाला पदक मिळण्याकरिता काहीही न करण्याचे  स्वातंत्र्य

माझ्या देशाची संस्कृती महान म्हणुन तिच्या महानतेच्या पुराव्यावर थुंकण्याचे,
जगात सगळीकडे लबाड्या करण्याचे स्वातंत्र्य

आपल्याच देशाच्या पोलीसदलात एक महिला असून व्यवस्थेविरुद्ध लढा देण्याचे
पण त्याच देशात चोरांनाही राजे म्हणुन संरक्षण द्यावे लागण्याचे स्वातंत्र्य

याच देशात कुठल्याही सन्मानाची अपेक्षा न करिता कुठेतरी जंगलात
आनंदवन निर्माण करण्याचे स्वातंत्र्य, दुसऱ्यांची जमीन सुपीक व्हावी म्हणुन
धरणात ज्यांची जमीन गेली त्यांच्या जागेकरिता लढण्याचे,
मोडक्या तोडक्या बंदुकांनी आणि फुसक्या जाकेटमधून
लढून अतिरेक्यांना पकडण्याचे स्वातंत्र्य

देशाच्या सरहद्दीवर शिपायांच्या पराक्रमावर अधिकाऱ्यांनी पदके मिळवण्याचे स्वातंत्र्य आणि असे अधिकारी मिळाले तरी आपल्या मातृभूमीला स्वतंत्र ठेवण्याचे स्वातंत्र्य

जय हिंद